संध्या

 रंगांवरती रंग बरसले

मनात धुमसे जणु ही बया

क्रोधित झाली संध्याराणी

क्षितिजाचीही बदले रया


लाटांमागुन आल्या लाटा 

किनार्यास आज मनवाया

उशीर झाला त्यांस यावया

बदलुन गेल्या दोन्ही काया


थंड उसासे मधेच टाके 

दुखावलेली सर्द हवा

हातातील वाळू सरसावे 

त्यावर फुंकर घालाया.


विशाल देखणे दृश्य ठेवले

तू मजपुढे का मी हरवाया?

कर्मकरंटे मीपण माझे 

नकार देई विसराया. 


-केतकी

कोण काय म्हणतं?


निराशावादी म्हणे खरा आशावादी असतो,
काहीतरी बदलेल म्हणुन बडबडत असतो.
ती बडबड बंद झाली तर काय समजावे?
त्याच्या आशा खर्या झाल्या की तो खरच निराश झाला?

गरीब माणुस म्हणे खरा श्रीमंत असतो,
जवळ काही नसतानाही खिस्यात हात घालतो.
त्याचा हात पुढे आला नाही तर काय समजावे?
तो पुरता कंगाल झाला की त्याचे खिस्याने त्याचा हात धरला?

मैत्री मधे म्हणे सारं न बोलताही कळत
दररोजच्या रगाड्यात न भेटताही प्रेम उरत
मित्र जेव्हा भेटतात आणि शब्दच निघत नाही
तेव्हा काय समजावे?
न बोलता संवाद झाला की बोलायला काहीच उरले नाही?

कोण काय म्हणेल म्हणुन मन घाबरत असत
पुढे काय होईल त्याला ठाऊक नसत
जगण्यातली ही अनामिक भिती निघुन गेली
तर काय समजावे?
सारी स्वप्नं पूर्ण झाली की स्वप्नच पडेनाशी झाली?

- केतकी
 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन.