भय इथले संपत नाही..मला कळलेले (थोडे अपूर्ण)

>भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
>मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

आज या कातरवेळी मला अनामिक भीती वाटते आहे. (येथे सोबत कुणीही नाही) मला तुझी आठवण येते आहे. तू आज माझ्या जवळ नाहीस पण तू शिकवलेल्या गीतांच्या सहवासात, तू सोबत असल्यासारखे वाटून कदाचित माझे भय दूर होईल.


>हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
>झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

हे झरे, हा चंद्र आणि लालीमा पसरलेल्या आकाशात गुरफटलेली धरा मला तुझी आठवण करून देत आहेत. तू जशी राख होऊन झाडांन मध्ये विखुरलीस तसा मी पण लयास जाईन पुन्हा या जगात यायला. (***दोन ओळी स्वतंत्र वाटताहेत पण त्या तश्या नसाव्यात. त्यातला संबंध लक्षात येत नाही आहे).


>त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
>क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

या सांजवेळी हा गुदगुल्या करणारा वारा आज स्वतःच हसतो आहे असे वाटते (तुझ्या आठवणीने मन प्रफुल्लीत झाल्यामुळे चोहुकडे आनंदमय वाटते आहे.) वितळणार्या सूर्याचा रसरशीत रंग लेऊन ही समुद्राची भरती जणू आकाशच घेऊन आली आहे.


>तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
>सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

मैथिलीला श्रीरामाच्या शेल्याच्या नुसत्या स्पर्शानेदेखील ज्याप्रमाणे वनवासाचा विसर पडावा त्या प्रमाणे तुझ्या हळव्या आठवणी माझ्या रुक्ष आयुष्यात हिरवळ आणतात.


>देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
>थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

आयुष्याचा संपूर्ण टप्पा न गाठता तू मधेच अशी निघून गेलीस (देऊळ म्हणजे वार्धक्य जेथे आपल्या कर्माचे, आयुष्याच्या फळाचे अर्घ्य ओंजळीतून वाहून स्वाः म्हणत स्वतःला मोकळे करायचे असते तसे न करता ते देऊळ यायच्या आधीच तुझ्या ओंजळीने अर्घ्य वाहून टाकले). तुझ्यावीण मी एकटा आणि हळवा झालो आहे.


>संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
>देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

(परंतु) तुझ्या आठवणींनी मला आज तृप्त केले आहे. सायंकाळी फुलून येणार्या कमळासारखा मी पण फुललो आहे. या निशेच्या निळ्या शाईत माखलेली वनराई हळू हळू माझा देह लपेटून घेते आहे.


>स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
>हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

जरी समाधानी मी आज तुझ्या आठवणीत तरी माझे गात्रन्गात्र तुझ्यासाठी झुरते आहे (ते फक्त तुझाच जप करतात). तुझ्या आठवणी जरी शीतल असल्या तरी तुझी कमतरता सतत जाणवते आहे. (तुझ्या शिवाय हे आयुष्य म्हणजे एक काळी रात्र आणि तुझ्या आठवणी म्हणजे शीतल, चमचमत्या चांदण्या. ही रात्र सरता सरत नाही आहे).


>ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
>मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई


1 comment:

Prajakta said...

केतकी,
संपूर्ण कविता दिल्याबद्द्ल धन्यवाद. बरीच कडवी मला माहिती नव्हती.

 
Copyright (c) 2010 शब्दस्पंदन.